Monday, January 11, 2010
अलविदा मि. गांधी.....अलविदा
ओळखलंत मला?
कसं शक्य आहे!?
आपल्याच मृत्यूला ओळखण्याचे भाग्य फार थोडया जणांना लाभतं.
पण तुमच्या डोळयात हे काय तरळतयं मि. गांधी?
भीती!!?
नाही,नाही,
प्रश्नचिन्ह ? कशाबद्दल ??
ओहो ! कमाल आहे तुमची मि.गांधी!!
मरतानाही वकीलपण जात नाही तुमचं.
हो, पण असू दे.
मलाही तुम्हाला ते सांगायलाच हवं.....कारण
असेच प्रश्न घेवून गेलात निरुत्तर तर...
एखादं पिशाच्च बनून पुन्हा याल
आणि बसाल पुन्हा इथल्या
हळव्या मनांच्या मानगुटीवर.
जीवनाचं रांगडं वास्तव पचवू न शकणारी, ही भित्री मने,
पुन्हा करतील तुमचाच जयजयकार!
नो नो नो मि. गांधी....
हे सगळं आता थांबवायलाच हवं....त्यासाठीच...
त्यासाठीच..तुमच्या डोळ्यातील ही प्रश्नचिन्हे मावळायला हवीत...कारण
कारण काय आहे मि. गांधी, तुमच्या त्या प्रश्नचिन्हांमध्ये विष आहे
मानवी मनाला जखडणारं.
म्हणून मि. गांधी तुम्हाला गेलचं पाहिजे.... नि:शंक!
करुणेच्या , प्रेमाच्या धाग्यातून ,
कसला प्रयत्न करताय गांधी तुम्ही....
व्यवस्था निर्माण करण्याचा?
आणि ही करुणेची महतीही तुम्ही सांगताय कुणाला?आम्हाला??
अहो, इथून तर बुध्दही हद्दपार केलाय आम्ही!
व्यवस्था कधीही करुणेतून निर्माण होत नाही....सत्तेतून होते
तुम्हाला हे सत्य कधीच कळले नाही मि. गांधी.
या केवढ्या मोठ्या असत्यावर प्रयोग चालू होता तुमचा!
मि. गांधी हाच होता तुमचा खरा गुन्हा!!
आणखी एक मि. गांधी, हे तुम्हीच म्हणायचा ना की
जग बदलण्याचा प्रयत्न करू नका म्हणून...
आणि तुम्हीच करत राहीलात प्रयत्न....छाती फुटेस्तोवर
काय तर म्हणे....एका वर्षात स्वराज्य आणि
एका जन्मात रामरा़ज्य स्थापन करण्यासाठी!!
पण तुमच्या या अशक्य स्वप्नांना,
आम्ही भुललो नाही मि. गांधी.
पुरतं जोखलं आहे तुम्हाला आम्ही.
आत्मबलावर आधारीत श्रेष्ठ समाजाच्या निर्मितीची
स्वप्न बघणारे तुम्ही...
तुम्ही तर आमच्याच जीवावर उठलात!
वंशश्रेष्ठत्वाचा, वर्णश्रेष्ठत्वाचा, अस्तित्वाचा अहंकार
हाच तर आमच्या जीवनाचा आधार!!
तो आधारच काढून घेण्याचा तुमचा कावेबाजपणा
वेळीच ओळखला आम्ही मि. गांधी
आणि अस्तित्वाचाच प्रश्न आल्यावर
डार्विन काय सांगून गेला ठाऊक आहे ना तुम्हाला
"Survival of the fittest!!!"
मग तुम्हीच ओळखा मि. गांधी
तुमच्या सारख्या दुबळ्या शरीराच्या जर्जर म्हातार्याने
जगायचं की आम्ही?
म्हणून तुमचा मृत्यू हा काही अधर्म वा खून नाही मि. गांधी
निसर्गाच्या नियमाप्रमाणे आम्ही आहोत बांधील
आमच्या आतील....अस्तित्वाच्या....आदिम भीतीला...आणि पाशवी नीतीला
जगण्याचा आमचा हक्क अबाधित राहण्यासाठी
तुमचा मृत्यू निश्चित आहे मि. गांधी.
नो नो नो,
मला पटवून देण्याचा कोणताच प्रयत्न करू नका
मी कानावरती घट्ट स्कार्फ बांधून आलो आहे
तुमचे ते भुलविणारे शब्द ऐकायचे नाहीत मला
माझा निर्णय पूर्ण झालाय...
हे पहा, हे पहा मि. गांधी,
मी वाकलोय क्षणभर तुमच्या पायावर...नमस्कारासाठी
ही माझी कृती केवळ माझ्या त्या अज्ञानापोटी
जग तरीही तुम्हाला का मानतं हे मला कधीच कळलं नाही म्हणून
आणि या पहा माझ्या हातातील पिस्तुलातून.....
सुटतील आता गोळ्या....तुमची वृध्द छाती भेदण्यासाठी.
एक सूचना आहे मि. गांधी
फक्त मरताना थोड्या मोठ्या आवाजात म्हणा
तुमचे ते ....हे राम की राम राम !
मि. गांधी, मि. गांधी,
आणखी एक शेवटचा सल्ला ऐकून जा...निर्वाणीचा
परमेश्वराशी तुमची जर जराही जवळीक असेल ना ...तर
तर मग मागा त्याच्याजवळ मुक्ति तुमच्यासाठी.
पुन्हा याच भूमिवर येण्याची चूक करू नका.
आमच्याच माणूसपणावर शंका घेणारे,
प्रश्न नको आहेत आम्हाला....मि.गांधी
अलविदा मि. गांधी.....अलविदा
ठो..........ठो...........ठो
Monday, October 19, 2009
प्राचिन शहाणपण..!
हजारो वर्षांचं मानवी जीवनाचं प्राक्तन....इतिहास बनून!
समरसून, रसरसून जगलेल्या
अशाच उत्कट जगण्यांच्या..
स्मृतींचे भग्न अवशेष!!
नृपांच्या वैभवी विलासाची,
सम्राटांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेची,
ययातीच्या अमीट वासनेची..... अंतिम विफलता.....थडग्यात ओघळ्णारी...
सिकंदराच्या रिक्त हातांसारखी!!
मी पाहिलयं...
जगण्याचं भव्य दर्शन,
विचार, वासनांचं विराट जग....कल्पनांनी सजलेलं...पण
अस्तित्वाच्या मुळापासून तुटलेलं!
माझ्यावरच लादलेली मी...जीवनाची फसवी माया!!
जगण्याच्या अखंड कोलाहलातून जेव्हा होतो मी क्षणभर अलिप्त
अन पोहचतो स्वतःपाशी, तेव्हा पाहतो
जीवनाने चालविलेली क्रूर विटंबना माझीच अन
जगण्याच्या अट्टाहासातून मी स्वतःच रचलेला ...माझा मृत्यू!
जो कंठरवाने मला सांगतो
"मी" जगतो तेव्हा मी खरंतरं मरत असतो
म्हणून अस्तित्वाच्या समग्रतेसह.....पुन्हा नव्याने जगण्यासाठी...
हवाय मृत्यू मला...!!
माझ्या इच्छा, आकांक्षा,वासना व आशेचा.....कारण
जीवनाशी जुडण्याचा अन्य कोणताच मार्ग नाही.
अनंत जीवनांच्या अनुभवांच ...प्राचिन शहाणपण..तेव्हा
अनाहताच्या ठाम स्वरातून..माझ्या मनात कुजबुजतं
"मी" मरतो तेव्हाच मी खरा जगत असतो
Saturday, September 26, 2009
अन मी राधा ना उरले
जागते वक्षावरची। ती कृष्णव्रणांची खूण ॥
उद्दाम स्तनांवर रुतता । त्या कृष्णसख्याचा भार।
हृदयातून अस्फुट फुटला। तो प्रणवाचा हुंकार॥
प्रणयात जागता सूर्य। स्पर्शाने रचला पुल।
द्वैताचे भानही सुटले। मज मोरपिसाची भूल॥
प्रेमाची भरती येता। देहाचे रांजण भरले।
चंद्राचा मज सांगावा। मी दिव्यत्वाला वरले॥
तो अणुरेणूतूनि फुटता। मी माझे मीपण हरले।
तो कृष्ण कृष्ण ना उरला। अन मी राधा ना उरले॥
Friday, September 25, 2009
थेंबाशी भिडतो सूर्य.....
पानांच्या रुतल्या रेषा
परि फुलपाखरू उडते
स्वप्नांच्या अवघड देशा
थेंबाशी भिडतो सूर्य
किरणांचे दाहक जाळे
गर्भात रूजविली त्याने
का इंद्रधनूची बाळे?
पेशींनी रचला देह
प्रेताचे प्राक्तन त्यास
मग संकेतांनी कसल्या
मजला जगण्याचा भास!
Monday, September 21, 2009
उषा राणी
तव हातांची
मधाळ गुंफन
अस्तित्वाच्या जागेसाठी
तव अधरांचे
प्रसन्न चुंबन!
तृप्त डवरल्या अंगाने
आऱक्त कोवळ्या रंगाने
अंधाराची सारून चादर
दिवसावरती पसरतेस तू
तू...... सूर्याची
प्रकाश घागर.
Friday, September 18, 2009
मी संध्येच्या ........काठावर
जेव्हा ढळते ... जगण्यावर निष्ठा
अन मरणही वाटे परके तेव्हा...
आशेवरती..मी विणलेले
सुखावरती रेखाटलेले
जगणेच.. जेव्हा होते ......धूसर
अस्तित्वाला मिटवून टाकून
शून्य..शून्य होण्यासाठी
हळवे मनही होते....आतुर
झोकून देतो.....काळोख्या रात्री...
जगण्याची मी सगळी आस
हात पसरतो....घेतो भरून
अस्तित्वाचा अंतीम श्वास
काळ्या कभिन्न अंधारावर...रोखतो
मी माझी निर्मम नजर....तेव्हा
तेव्हा...... ती गर्भार रात्र..
का खुणाविते मला?
संकेतांनी...जीवनाच्या??
................................
................................
दिवसही नाही....रात्रही नाही
दोहोंच्याही.....
......... मी सीमेवर
मी संध्येच्या काठावर अन
सोबत माझे...
......... मन हे कातर
Saturday, September 12, 2009
कारण .... मित्रा...
सत्य इतकं स्वस्त का ठरवितो आपण ?
जगाचा निवाडा करण्याची जेव्हा करतो भाषा आपण, मित्रा
तेव्हाच हरविलेली असते आपण जगावर प्रेम करण्याची क्षमता.
अन प्रेमाशिवाय माणूसच नव्हे तर जगही समजत नाही आपल्याला
स्वतःच्या क्षुद्र अहंकारापेक्षाही जग खूप मोठं आहे..... राजा
पण.....समर्पणाच्या क्षमतेशिवाय हे भान येणं खूप अवघड आहे.
म्हणून तुला सांगतो मित्रा की
अस्तित्वाच्या व्यापकतेत.... स्वतःच्या संवेदनांना
इतकं कुरवळणं बरं नव्हे.
अहंकार वेगळं करतो आपल्याला समष्टीपासून
अन आपण बसतो त्याला कुरवाळीत
स्वतःची ओळख म्हणून
तुझ्या माझ्या कल्पनेपेक्षाही खूप
निरपेक्ष असतं जीवन, दोस्त
म्हणून पूर्वग्रहांच्या द्रुष्टीने जग समजत नाही
आपणच जगण्याला पारखे होतो.
जाणीवेच्या विश्वातील हे फक्त चार क्षण आपल्या हातात आहेत, मित्रा
पण हरकत नाही! तू येईपर्यंत युगान्तापर्यंत वाट बघण्याची..
माझी तयारी आहे...कारण...
माझ्या प्रिय मित्रा....
मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो आहे
Saturday, September 5, 2009
मेल फँक्टर
हिच्या गालाच्या खळीचा, तिच्या ओठावरचा तीठ
हिच्या श्वासाचा सुगंध, तिच्या ओठांचा अंगार
हिच्या मानेचा झटका , तिच्या स्तनांचा उभार
हिच्या सूरात गोडवा , तिची नजर खट्याळ
हिचे पाझरे वात्सल्य , तिचा श्रृंगार घायाळ
हिच्या मायेचा दिलासा , तिच्या प्रणयाची धग
हिच्या कुशीत विसावा , तिच्या स्पर्शातली जाग
रूप भावतसे हे ही , ओढ़ त्याही लावण्याची
हिच्या प्रेमाची निष्पाप , तिच्या धुंद तारुण्याची
किती विविध रुपांच्या , छटा मोहक सामोरी
एका फुलांत रमेना , मन माझे व्यभिचारी
दोष माझ्या नजरेचा की तुझ्या स्रुजनाचा
डाग माझ्या माथी अन का तू धनी पूजनाचा ?
चहुवार उधळले का तू सौंदर्याचे धन ?
माझ्या सीमित क्षणांना एका दिशेचे बंधन !
Wednesday, September 2, 2009
आचार्य......
(अण्वस्त्रांचे समर्थन करणार्या शास्त्रज्ञासाठी)
असहिष्णु धर्मांधतेचा विषारी प्रचार करणार्या,
स्वाभिमानशून्य, अपरिपक्व सत्ताधिशांच्या,
आक्रमक, हिंसक वृत्तीचे प्रतिक बनताहात, आचार्य तुम्ही,
ज्ञानी, समर्थ्,शस्त्रांचे अधिपती असताल तरिही...
हे शुक्राचार्य बनणे सोडा तुम्ही
लाकूड उपकारीच असतं सर्वार्थाने आचार्य,
पण तत्वांचं विखारी लखलखतं धारदार पातं
त्याला जोडलं जातं तेव्हा ते स्वतःच्याच कुळाचा,
अस्तित्वाचाच, घातही करतं
शस्त्राने सामर्थ्याचे प्रदर्शन करता येते पण
सामर्थ्य निर्माण करता येत नाही ,
दहशतीने , धाकाने युध्द टाळले जावू शकते...
पण शांतता प्रस्थापित होतेच असे नाही
युध्दाचा मार्ग संपला की द्वेषाला फुटतात दहशतीचे धुमारे
मोठ्या शस्त्रांनी गर्दीशी लढता येतं .... आचार्य
व्यक्तीशी लढता येतं नाही अन द्वेषाने......
शत्रूशी लढता येते....
पण वृत्तीशी लढता येतं नाही
अणु -विभाजनातूनच आपण सामर्थ्य निर्माण करतो आहोत..... अण्वस्त्रांप्रमाणे
अन आता सामर्थ्यातून विभाजन
मनां-मनांना एकत्र आणण्यासाठी.... सर्वाधिक ...आचार्य,
शस्त्रांची नव्हे .....
प्रेमाची गरज असते
Sunday, August 30, 2009
ग्रीष्म
ग्रीष्म तापला तापला , त्याची कोसळली आग
क्षणापूर्वीचा बहर , त्याची कोमेजली जाग
त्याने डोळ्यातली ओलं , पिली अधाशी ओठानं
आग कंठात रोवली , त्याच्या निखारी बोटानं
अंगा-अंगातले पाणी , गेले आकाशाच्या भेटी
तळ तापल्या नदीचा , आला उसासून काठी
आग पेटत्या ऋतूची , नसानसांत दाटली
फुला-फुलांत झाडाच्या , शिरं रक्ताची फाटली
असे उकले काळीज , दग्ध धरतीची काया
अंग जाळतो साजण , पुन्हा फुलवून याया
Thursday, August 27, 2009
समजूत
मी सुध्दा चिडलो आहे
कारण काही विचारू नकोस
मी सुध्दा चिडलो आहें
काय गुन्हा झाला एवढा ?
.म्हणून रुसवा डोंगराएवढा
चूक एखादी होते कारण
माणूस म्हणून घडलो आहे ............ मी सुध्दा चिडलो आहे
आकाशाचा संदेश घेवून पक्षी
मातीचे उड़त असतात
भेटत नाहीत कधी तरीही
आकाश धरा चिडत नसतात
अन्तर राखून जगतात कसे
कोडयाने या पिडलो आहे ............मी सुध्दा चिडलो आहे
सागरालाच ओढ़ नाही
नदी का गं म्हणत नाही
जागेवरती उसळतो म्हणून
चिडून का गं रुसत नाही
तरी धावते आवेगाने
का? या चिंतेत पडलो आहे ............मी सुध्दा चिडलो आहे
( ती हसू लागते )
हसू नकोस जीवघेणी
राग माझा पळवू नकोस
मीही चिडलोय खराखुरा
निश्चय माझा ढळवू नकोस
माहीत आहे मनाने मी
जरी तुझ्याशी जोडलो आहे .............मी सुध्दा चिडलो आहे
( आता अबोला असह्य होतोय म्हणून हा तहाचा युक्तीवाद )
पण आकाशाच्या निखा-याने
फुले सुध्दा फुलतात की
मौनामध्ये अंधाराच्या
शब्दचान्दन्या खुलतात की
झाडामध्ये अडला वारा
सूर बनून सरकत आहे
चिडलो आपण दोघे तरीही
बोलायला काय हरकत आहे?
Wednesday, August 26, 2009
मना-मनाचे कोमल नाते, आपुलकीचे प्रेमळ बंध
स्नेहावाचून कसा मिळावा , जगण्यातील निर्मळ सुगंध
जगण्याचे सामर्थ्य मिळवूया
जीवन सुंदर चला घडवूया
अपेक्षांचे अवघड ओझे, नात्यांचे चैतन्य चोरते,
स्वार्थापुरते जगणे निर्मम , दू:खाचे प्रारब्ध कोरते
अधिकाराच्या भाषेवाचून , प्रेमाचा संवाद घडवूया
जीवन सुंदर चला घडवूया
पवित्रतेचे चिंतन सुंदर, धडा दाखवू वागणुकीचा
आणी जपूया एक तेवता, दिवा अंतरी माणुसकीचा
परस्परांच्या विश्वासाने , व्यवहाराची वाट चालूया
जीवन सुंदर चला घडवूया
स्वतंत्र आपण, समर्थ आपण , ठाम खूण ही मनांत बांधू
आप-परान्तील विश्वासाचा, पूल मनामनांतून सांधू
जगण्यावरच्या भक्तीमधूनी , शक्ती मिळवू या
जीवन सुंदर चला घडवूया
जीवन मिळते , जसे चिन्तीतो , विचार घडवे सृष्टी
नव्या जगाला, चला पाहूया , जरा बदलूनी दृष्टी
चैतन्याला मुक्त करूनिया , उधळून देवूया
जीवन सुंदर चला घडवूया
भीती कसली पराभवाची , सोडू जगणे उदासवाणे
चला उठूया आनंदाने , गावून टाकू जीवनगाणे
हात - मनाच्या सामर्थ्याचे दर्शन घडवूया
जीवन सुंदर चला घडवूया
Monday, August 24, 2009
अहंकार
Sunday, August 23, 2009
कधी जणू
मतदार राजा
काळोख घेवून उरामध्ये असा का तू जगतो आहेस ?
चिता तुझ्याच सन्मानाची का मूढपणे बघतो आहेस ?
गजसहस्त्राचे बळ परी बाहू का रे जडावले ?
विश्वप्रकाशी चैतन्य तुझे असे का रे थंडावले ?
लाचारीने जगणे राजा सोड वागणे हे षन्ढाचे !
घेवूनी मशाल उचल रे शिंग फूंक तू बंडाचे !!
Saturday, August 22, 2009
खळबळ
वावटळ झेललेल्या पानसळीला अजून पंख वा-याने झंकारू नकोस
दोन घटका येवून उडून जातोस पाखरा , अचानक
कधी जाणलयं ........... या झाडाचं एकाकीपण
तुझ्या येण्याच्या आनंदापेक्षा जाण्याची हुरहुरच
जास्त लागते मनाला
अरे, वास्तवाच्या जमीनीला मूळं बांधली आहेत म्हणून
नाही येता येत उडून तुझ्याबरोबर
पण तरीही मी शांत आहे कारण
मला माहितेयं , की उडालास आकाशात चार क्षण
तरी तुझं हक्काचं , निवा-याचं ठिकाण मीच आहे
पण हे दुराव्याचं नातं नाही रे सहन होत
तुला मला सांधणा-या या अप्रतीघाताची अमूर्तता ,
लक्ष लक्ष भाल्याची टोके बनून , विदीर्ण करते मनाला
अवघडं होतं रे , एवढं सारं सहन करून
पुन्हा स्थितप्रज्ञासारखं उभं राहाणं
टाळूनही मग ही खळबळ व्यक्त होते
इतरांना वाटते की , ही पानांची सळसळ आहे
वास्तव
बीजं
उदात्त प्रेमाचं असो वा
रानटी बेभान वासनेचं
नवजन्मासाठी समर्पीत केलेलं असो वा
अनावर उन्मादात ओतलेलं
फळतं ,तेव्हा
इच्छा अनिच्छेच्या संदर्भाशिवाय
वाढते एक जाणीव
तिचे स्वतंत्र अस्तित्व घेवून
त्या जगण्याचा सम्भव
फक्त .....................
बीजाच्या मिलनात असतो